पुणे : ‘गुणवत्ता नसलेल्या पदवीधारकांनाच बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागते. ज्यांच्याकडे सृजनशीलता आणि नाविन्यतेचा ध्यास आहे, अशा अभियंत्यांना नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीची पदवी घेताना कौशल्याभिमुख गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत,’ असे प्रतिपादन ‘टेकमहिंद्रा’चे धनंजय दिवाण यांनी केले.
केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या (आयईटीई) यांच्या संयुक्त विद्यमाने केजे संकुलात आयोजित ‘ग्रॅव्हिटी २०१८’ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रसंगी ‘टेकमहिंद्रा’चे वरिष्ठ व्यवस्थापक प्रकाश काजवे, डीपर संस्थेचे हरीश बुटले, ‘आयईटीई’चे एस. के. खेडकर, फिनोव्हेशन टेकचे वाँग हाँग, ओहा सोल्युशनचे प्रशांत करंदीकर, केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, संस्थेचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, केजे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ‘ग्रॅव्हिटी २०१८’चे समन्वयक डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर, ट्रिनिटी अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. विजय वाढई, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. जयंत वारके, प्रा. दीपक मेहेत्रे, प्रा. प्रतिभा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थी प्रकाश गावडे याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले; तसेच संकुल संचालक डॉ. व्यासराज काखांडकी यांच्या संकल्पनेतून ‘कँपस कनेक्ट’ या न्यूजलेटरचे प्रकाशन करण्यात आले. दोन दिवसीय महोत्सवात पाचशेहून अधिक संशोधन प्रकल्प आणि पोस्टर्स सहभागी झाले आहेत.
प्रकाश काजवे म्हणाले, ‘हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे झपाट्याने बदल होत आहेत. बदल आयुष्याचा अविभाज्य घटक असून, तो आपण काळाबरोबर स्वीकारला पाहिजे. नवतंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. जो काळाबरोबर नवी आव्हाने स्वीकारतो तोच टिकून राहतो.’
हरीश बुटले म्हणाले, ‘तांत्रिक कौशल्यासोबतच नैतिक व सामाजिक मूल्ये आपण अंगिकारली पाहिजेत. त्यातूनच एक चांगल्या अभियंत्यासह चांगल्या व्यक्तीची निर्मिती होते. कुटुंबाच्या, देशाच्या विकासाठी आज नीतिवान नागरिकांची गरज आहे.’
कल्याण जाधव म्हणाले, ‘आपल्या देशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत; मात्र, त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. केजे शिक्षण संस्था कौशल्याभिमुख अभियंते निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्य व केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.’
‘विद्यार्थ्यांतील संशोधन वृत्ती वाढावी व नवनिर्मितीचा चालना मिळावी, यासाठी ग्रॅव्हिटी महोत्सव आयोजित केला जातो,’ असे डॉ. सुहास खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.